चाळीसगाव: प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय चाळीसगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ८९ वा शिव परमात्म्याचा अवतरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून किरण कुमार कबाडी आणि त्यांच्या पत्नी, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन आणि ग्रामीणचे राहुल पवार आणि त्यांच्या पत्नी, तसेच चाळीसगाव ब्रह्मकुमारी संचालिका वंदना दीदी, सुनिता दीदी, कल्पना दीदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा फेटा, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना किरण कुमार कबाडी म्हणाले, "ब्रह्मकुमारी विद्यालय नकारात्मक विचारांना सकारात्मकतेकडे वळवण्याचे काम करत आहे. या विद्यालयामुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत आणि त्यामुळे आमचा भार कमी होत आहे."
राहुल पवार म्हणाले, "मी गेली सात-आठ वर्षे ब्रह्मकुमारी संस्थेच्या संपर्कात आहे. त्यांची कार्यपद्धती, तणावमुक्त जीवन आणि व्यसनमुक्ती अभियान मी जवळून पाहिले आहे. आजच्या जीवनात ध्यान (मेडिटेशन) करणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे."
वंदना दीदी यांनी ब्रह्मकुमारी विद्यालयाची ओळख करून दिली, तर सुनिता दीदी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला ब्रह्मकुमारी परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.






0 टिप्पण्या